जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने ‘हर घर तिरंगा’ला प्रारंभ

रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. याच ठिकाणावरुन दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली निघाली. याला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला व ते स्वत:  या रॅलीत सामिल झाले. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड,  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सुर्यवंशी, रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फुलून गेले होते. यावेळी पोलिस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलिस बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रीडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.
या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस दर, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगर पालिका यांचे चित्ररथ देखील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button