राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना येत्या 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. समर्पित वृत्तीने काम करणार्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरवले जाते. शैक्षणिक वर्ष 2022 साठी वस्तुनिष्ठ निकषाद्वारे पुरस्कार प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांना 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. तसेच या अनुषंगाने या प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट 10 ते 11 ऑगस्ट दरम्यान, जिल्हा स्तरावरील मुलाखती 12 ते 13 ऑगस्ट दरम्यान, राज्य स्तरावरील मुलाखती 16 ते 20 ऑगस्ट, पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम 22 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक 23 ऑगस्टला, तर शासनास अंतिम यादी 24 ऑगस्टला सादर करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.