
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच प्रतिसाद
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पन्नासटक्केच प्रतिसाद मिळाला असून विशेषत: भात आणि नाचणी पीक क्षेत्राचा विमा काढण्याकडे शेतकर्यांचा कल कमी असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1608 शेतकर्यांनी 337.95 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला असून या योजनेत सहभागाची होण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. विमा उतरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरीता शासनाकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी असून सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना योजना ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकरी विमा हप्ता खरिप हंगामासाठी 2 टक्के, तसेच रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरिप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा आहे. भात पिकासाठी 50 हजार विमा संरक्षित रक्कमेसाठी, विमा हप्ता रक्कम 1 हजार रुपये तर नाचणीसाठी 20 हजार रुपये विमा संरक्षित रक्कमेला विमा हप्ता रक्कम 400 रुपये आहे. खरीप हंगामात आतापर्यंत 1608 शेतकर्यांमधील 1545 जणांनी भात क्षेत्र तर 63 शेतकर्यांनी नाचणी क्षेत्राचा विमा उतरवला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र मंडणगड तालुक्यातील आहे. मात्र यावर्षी विमा उतरवण्यास शेतकर्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्केच शेतकर्यांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी तालुका कृषी अधिकार्यांनी मंडळनिहाय योग्य पध्दतीने नियोजन केले होते. त्यामुळे 954 जणांनी विमा उतरवला होता. यंदा 138 शेतकर्यांनी विमा उतरवलेला आहे. यंदा मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 661 शेतकर्यांनी विमा उतरवला आहे.