गडनदी धरण फुल्ल; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरणातून सोमवारी रात्री 8 वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गडनदी प्रकल्प कुचांबेचे उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी दिली.
धरणाची संचय क्षमता 121.15 मिटर असून मंगळवारची पाणी पातळी 121.35 मी एवढी आहे. 20 सेमी उंचीने पाणी वाहत असून विसर्ग 10.52 घ.मी./सेकंद आहे. सध्या धरणात एकूण 66.699 दलघमी पाणी साठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा 66.387 दलघमी एवढा आहे.
शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरू नये व स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकर्‍यांना वरदान ठरू पाहत
आहे.
धरणात पूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहलाचा विषय बनला आहे. तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून 4 जुलै ते 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मागील 24 तासांत एकूण 171 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जूनपासून एकूण 902 मि.मी. पावसाची नोंद झाली
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button