बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भावनिक साद

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी भावनिक संवाद साधला.
मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे.. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.
या पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली.मागील काही दिवसांपासून शिवसेना हिंदुह्रदय सम्रात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसल्याचे बोलले जात आहे. विविध आरोप केले जात आहे. शिवसेना पूर्वीसारखी राहिली नसल्याचे असे भासवले जात आहे.अस मी काय केलं की ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो.उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि हिंदुत्व वेगळी नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कुणी काय केले हे सांगण्याची वेळ नाही. काहीजण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतायेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच आपण पुढे घेऊन चाललोय. विचार, मुद्दा तोच आहे. २०१४ मध्ये प्रतिकुल परिस्थिती शिवसेनेने ६३ आमदार निवडून आले. पहिल्या मंत्रिमंडळात आणि आत्ताच्या मंत्रिमंडळात तेच मंत्री होते. मधल्या काळात जे काही मिळाले शिवसेनेने मिळालं हे लक्षात ठेवा असं त्यांनी सांगितले.त्याचसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचे फोन येतायेत, आम्हाला परत यायचंय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्यादिवशी हॉटेलमध्ये गेलो. तेव्हा म्हटलं, शिवसैनिक मरमर मरतात आणि निवडून आणतात. बाथरूमला गेला तरी संशय ही कुठली लोकशाही. बाळासाहेबांनाही हे पटणारं नाही आणि मलाही पटणारं नाही. मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळला. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाज असल्याने वेगळा मार्ग पत्करावा लागला. जे काही घडले सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button