कोकणातील पहिल्या डीआरटीबी केंद्राचा क्षयरोग रुग्णांना दिलासा
रत्नागिरी : कोकणातील पहिले डीआरटीबी केंद्र चिपळूण येथे सुरू झाल्यानंतर क्षयरोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या केंद्रामुळे जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यास मदत होणार असून सध्या या केंद्रात जिल्ह्यातील 65 रुग्णांवरती औषधोपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून वेगाने सुधारणा होत आहे.
डीआरटीबी केंद्र, खासगी व सरकारी भागीदारी शासन धोरणावर आधारित कोकणातील पहिले केंद्र वालावलकर हॉस्पिटल डेरवण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आहे. हे केंद्र माहे डिसेंबर 2021 मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील डीआरटीबी केंद्रात माहे जानेवारी 2022 ते आजपर्यंत 65 रुग्णांवरती औषधोपचार सुरु केले आहेत. सदरच्या डीआरटीबी केंद्रात रुग्णासाठी जेवण, रहाण्याची सोय व औषधोपचार शासनामार्फत मोफत केले जातात. या डीआरटीबी केंद्राआधी डीआरटीबीची औषधे रुग्णास सुरु करण्यासाठी मुंबई येथे जावे लागत होते. त्यामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना आर्थिक ताण येत होता. तसेच पुढील औषधोपचार सुरू होण्यास विलंब होत होता. ही गैरसोय आता दूर झाल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे यांनी सांगितले.