खर्च परवडत नसल्याने दूध संकलन बंद करण्याच्या सूचना; शेतकर्‍यांचे नुकसान

रत्नागिरी : वाहनाचा खर्च परवडत नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन बंद करण्याबाबत दुग्ध व्यवस्थापक, शासकीय योजना यांनी सर्व संबंधित संस्थांना कळविले आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज 2 लाख 55 हजार लिटर दुधाचे उत्पादन करण्यात येते. सुमारे 19 हजार 133 शेतकरी दुधाचे उत्पादन घेतात. मात्र, दूध संकलनाची बिले वेळेवर न झाल्याने सुमारे 50 लाख रुपये प्रलंबित आहेत. तसेच दुधाचे संकलन करून त्याच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने दूध संकलन बंद करत असल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवस्थापकांनी संबंधित संस्थांना कळवले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध उत्पादनात आघाडीवर नसला तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी दुग्ध उत्पादनामुळे मोठा हातभार मिळतो. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय मृतावस्थेत जाण्याची भीती आहे. त्यामुळे हा व्यवसाय बंद होणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या खर्चाबाबत पुन्हा आराखडा तयार करून प्रलंबित बिले अदा करून रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन बंद होणार नाही, यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत आणि दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button