रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत असल्याचा निष्कर्ष
कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बंद
रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेवून मार्गदर्शन करावे, अशा प्रकारची चर्चा सर्वसाधारण सभेत झाली.
नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सात विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे आणि त्यासाठी जागा निश्चिती करण्याबाबतचा विषय सुरूवातीलाच चर्चेला आला. मात्र याबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी व इतर सदस्यांनी या नसबंदीचा काहीच फायदा होत नसल्याचे सभागृहापुढे मांडले. भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांची नसबंदी करुन पुन्हा त्याच ठिकाणी त्याला सोडले जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांचा उपद्रव कायम आहे. आतापर्यंत या निर्बीजीकरणावर पालिकेने ५० लाखांच्यावर पैसे खर्च केले आहेत. तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे आता निर्बीजीकरण मोहीम बंद करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. पुढील उपाययोजनेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. www.konkantoday.com