
लोकप्रतिनिधींचे पुतळे जाळून आंदोलन करण्याची वेळ आणू नका तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारा – अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. जिल्हा रुग्णालयात पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्र अपुरी मॅनपॉवर, अपुरे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यामुळे यंत्रणा कोलमडली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण आहे. काही प्रायव्हेट हॉस्पिटल ही रुग्णसेवा देण्यास नकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र शासनाचा कारभार इतका भोंगळ आहे की ह्या कशामध्ये सुधारणा करावी, नियंत्रण करावे असे लोकप्रतिनिधींना वाटत नाही. स्वॅब टेस्टिंग लॅबच श्रेय घ्यायला सर्वांनी मिरवल. मात्र ही लॅब पूर्ण संख्येने रिझल्ट देत नाही. रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागतो. ही दिरंगाई होण्यामागे कारण काय? त्रुटी सुधारणा कशी करावी? याबाबत मंत्री लोकप्रतिनिधी शासनकर्ते ढिम्म आहेत. सर्वदूर स्क्रिनिंग चालू कराव याबाबत निर्णय होत नाही. रत्नागिरीत आजारी पडणे म्हणजे मृत्यू गोलात शिरण्यासारखं झालंय. मात्र ग्रामपंचायतीपासून राज्यापर्यंत सत्ता प्राप्त झालेले सत्ताधिश कशात मशगुल आहेत? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण येत आहे. डॉक्टर संख्या अपुरी आहे. वॉर्डबॉय नर्स या जवळजवळ नाहीत अशी स्थिती असून लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून डॉक्टर उपलब्ध करू करू शकत नाहीत हे दुर्दैव आहे. रत्नागिरीतील डॉक्टर्स, हॉस्पिटल यांच्या सेवा या महामारीच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री, स्थानिक मंत्री, आमदार, खासदार हे कधी प्रयन्त करणार यांना जाग कधी येणार शासन कधी हलणार हा प्रश्न आक्रंदून रत्नागिरीकर विचारतोय आणि रत्नागिरीचे आरोग्य अधांतरी टांगून शासनव्यवस्था अशीच ठप्प राहिलेली आम्ही पाहू शकत नाही. तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलन उभारावे लागेल. ही आंदोलनाची वेळ नाही याची जाणीव आहे मात्र आरोग्य यंत्रणेबाबत सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे. कुटुंबाच्या कुटुंबे या स्थितीत प्रचंड दडपणाखाली आहेत अशा वेळी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी म्हणून आक्रमक व्हावे लागेल असा सज्जड इशारा भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिला.
www.konkantoday.com