रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार केले उदध्वस्त, कुटुंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी तरूणाने केली पराकाष्ठा.

रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने दापोली, दाभोळ परिसरातील हर्णै, पाजपंढरी येथील अनेकांची घरे अक्षरशः उदध्वस्त केली. त्यामुळे अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले. या वादळाचा फटका बसलेले दर्शन चौगुले यांनी या चक्रीवादळाचे वर्णन करताना हे वादळ अतिशय भयानक असल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे त्यांचे घरातील सर्व ७ सदस्य व त्यामध्ये अगदी लहान ५ महिन्याच्या बालकाचाही समावेश होता. वादळ येणार हे माहिती असले तरी ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर येईल याची कोणालाही कल्पना नव्हती. साधारण सकाळी १० च्या सुमाराला वादळ सुरू झाले. आमच्या घराचे पत्रे जोरजोरात वाजू लागले. आम्ही सर्वजण घराची दारे लावून घरातच बसलो. मात्र वादळाने अधिकच जोर केला आणि घराचे पत्रे धडाधड उडू लागले. यामुळे काय करायचे हे सुचेनासे झाले असतानाच घरातील सदस्यांचा जीव वाचविण्यासाठी चौगुले यांनी समोरील असलेल्या बाथरूममध्ये आश्रय घेतला. तेथूनही वादळाचे भयानक तांडव आम्हाला दिसत होते. घराच्या वीटाही हळुहळू बाथरूमवर पडू लागल्या. त्यातूनही आपण धीर करून पाच महिन्याच्या मुलाला जवळच असलेल्या स्लॅबच्या पक्क्या घरात घेवून गेलो व त्यांना या मुलाला सांभाळण्याची विनंती केली. त्यानंतर त्या मुलाला त्या घरी सुरक्षित ठेवून इतर सदस्यांना घराच्या बाथरूममधून बाहेर काढले व जवळच्या शेजार्‍यांच्या घरात आसरा घेतला. १५-२० मिनिटांनी वादळ शांत झाले. तोपर्यंत आमचे घर उदध्वस्त झाले होते. घरातील अन्नधान्य, कपडे, सामान भिजून नष्ट झाले होते. तरीदेखील आपण या भयानक वादळातून घरातील सदस्यांसह वाचू शकलो हे समाधान आम्हाला मिळाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button