मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांच्या मृत्यू बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खुलासा केला
कोरोना रुग्णांची सेवा करताना मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला. ज्या रुग्णालयात हे डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत होते, त्याच रुग्णालयात त्यांना बेडसाठी कित्येक तास ताटकळत राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी बातमी सर्वत्र पसरली. मात्र खरी परिस्थिती काय होती, याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खुलासा केला आहे.
इंडियन मेडिकलअसोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, “६१ वर्षांचे डॉ. चित्तरंजन भावे यांना मधुमेह होता. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती, स्टेंट बसवलेले होते. तरी ते माणुसकी म्हणून कोरोना रुग्णांवर उपचार करत होतो. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला. मुंबईतील रहेजा रुग्णालयात मानद शल्यक्रिया तज्ज्ञ म्हणून काम करत होते. त्यांनी त्याच रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णालयाला फोन केला. मात्र रुग्णालयात जागा नसल्याने ते घरीच थांबले. प्रसारमाध्यमांवर बातम्या पसरल्या की त्यांना १० तास रुग्णालयात जागा मिळाली नाही. तर वस्तुस्थिती तशी नाही. जेव्हा रुग्णालयात जागा रिकामी झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा ते स्वत: रुग्णालयात गेले”
“रुग्णालयात सुरुवातीला ४ दिवस वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्या शरीरात ऑक्सिजनमध्ये कमतरता झाली तसं त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. त्यांना वेंटिलेटरवर ठेवलं गेलं. त्यांच्या किडनीवर ताण पडला होता, त्यांचं डायलिसिसही करण्यात आलं. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला”
www.konkantoday.com