स्वच्छता ही सेवा अंतर्गत उद्या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम -सुनील चव्हाण
रत्नागिरी दि.05 – स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती आणि स्वच्छता अभियानांतर्गत 06 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील समुद्र किनाऱ्यांवर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानांसंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, तहसिलदार वैशाली पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जि.प.च्या अर्चना वाघमळे आदि संबधित यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा अभियान आणि मतदार जनजार्गती या अभियाना अंतर्गत जिल्हयातील हर्णे, पालशेत, भाटये, आरे-वारे, गणपतीपुळे, आंबोळगड या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्या उद्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वेळी जिल्हयातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ होणार आहेत त्यानुषंगाने निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि पर्यटकही वाढतील. किनारे स्वच्छ ठेवा, कचरा टाकू नका आदि विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.
यामध्ये सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ता व हॉटेल व्यवसायिक यांनीही भाग घ्यावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे.या स्वच्छता अभियानामध्ये अधिकारी, कर्मचारी, शाळेतील मुले, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचा सहभाग असणारच आहे त्याबरोबर तेथील स्थानिकांनीही सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्वच्छता अभियानांतर्गत अभियान राबविताना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविण्यात येईल असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूका 2019 च्या अनुषंगाने जिल्हयातील पाच ब्रँन्ड अम्बॅसिडर नेमन्यात आले असून तेही या अभियानात भाग घेणार असून ते मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वच्छता अभियान आणि मतदार जनजागृती च्या माध्यमातून जनतेपर्यंत एक चांगला संदेश जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.