नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ जनआंदोलनाला लोकांचा मोठा प्रतिसाद

रत्नागिरी ः कोकण विकास समितीच्यावतीने नाणार येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर रत्नागिरी येथे एकत्र आले असून या रिफायनरीच्या समर्थनार्थ समाजातील विविध घटकांशी संपर्क साधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. शाळा, कॉलेजीस, विविध संस्था, सामाजिक संस्था आदी ठिकाणी जावून या प्रकल्पाची गरज व माहिती समितीच्यावतीने देण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही उलट हा प्रकल्प झाला तर या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. तसेच येथील स्थानिक तरूणांना मोठ्या प्रमाणावर नोकरीचीही संधी मिळणार आहे. कोकणात सर्वच प्रकल्पांना विरोध होत असल्याने कोकणात चांगले प्रकल्प यावेत यासाठी या समितीने पुढाकार घेतला आहे. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबतची माहिती जनतेला देण्यात आल्यानंतर जनतेकडून, व्यापार्‍यांकडून व उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने ही नव्याने उभी राहिलेली चळवळ यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. या नाणार प्रकल्पात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत व ते या प्रकल्पासाठी जमिनी देण्याची तयारी दाखविली आहे. तसेच त्या भागातील प्रकल्पाच्या बाजूने उभे राहणार्‍यांना ही समिती एकत्र आणत आहे. या प्रकल्पाबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले असून त्याबाबत असलेल्या शंकाही दूर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या समितीच्या कार्यात कोकणाविषयी आस्था असलेले अनेकजण जोडले जात असून येत्या २० तारखेला ग्रीन प्रकल्पाच्या समर्थनार्थ तसेच हा प्र्रकल्प नाणार येथे व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
आता नाही तर कधीच नाही, विचार बदला कोकण बदलेल हा उद्देश समोर ठेवून ही समिती काम करीत आहे. या नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ रत्नागिरी शहर व अनेक भागात पोस्टर्स व होर्डींग्ज उभी करून जनजागृती केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button