ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

रत्नागिरी ः गणपतीपुळे मार्गावरील निवळी-मासेबावदरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार ठोकर दिली. दुचाकीला भीषण ठोकर झाल्याने त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्या दोघांचाही मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून सेवानिवृत्त झालेले सूर्यकांत जाधव (रा. चाफवली-संगमेश्वर सध्या राहणार कारवांचीवाडी) व त्यांच्यासोबत रवींद्र बाबल्या धनावडे (२८, रा. कारवांचीवाडी) या दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास हे दोघे करबुडेहून निवळीकडे दुचाकीवरुन येत होते. त्याचवेळी निवळीहून जयगडच्या दिशेने जाणाऱया ट्रकने (एमएच ४५ -९५९६) दुचाकीला जोरदार ठोकर दिली. यावेळी ट्रकच्या धडकेने दुचाकी काही अंतर रस्त्यावर फरफटत गेली. तर दोघेही दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला जावून उलटला.
या अपघातामुळे दोन्ही दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातील एकाच्या पायाचा पंजापासूनचा भाग तुटला होता. अपघातानंतर त्या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यातील जाधव यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान धनावडे याचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची खबर संदीप गोरे यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. त्याविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा करून दोन्हींही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button