केळ्ये पड्यारवाडीतील पाणी प्रश्न आ. उदय सामंत यांनी तात्पुरत्या स्वरूपात सोडविला
रत्नागिरी ः गेले काही दिवस माध्यमांवर झळकत असलेल्या केळ्ये पड्यारवाडी येथील पाण्यासाठी ग्र्रामस्थांना करावी लागत असलेल्या भीषण वास्तव्याबाबत रत्नागिरीचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जातीने लक्ष घालून व घटनास्थळी भेट देवून पड्यारवाडी येथील ग्रामस्थांचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सोडविला आहे. या ठिकाणी काही खाजगी जणांच्या विहिरीतील पाणी पड्यारवाडीतील ग्रामस्थांना उपलब्ध करुन दिल्याने ग्रामस्थांचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सुटला आहे. पड्यारवाडीतील असलेल्या विहिरीतील पाण्ययाचे स्त्रोत आटल्यामुळे या वाडीतील लोकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. पाणी संपलेल्या विहिरीत खाली उतरून खड्डा मारून एक एक कळशी ग्रामस्थांना पाणी मिळत होते. यासाठी वाडीतील महिला व ग्रामस्थांना रात्रभर विहिरीवर जावून बसावे लागत होते. रत्नागिरीतील माध्यमांनी याबाबत वस्तुस्थिती प्र्रशासनाकडे मांडल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले होते. तहसिलदारांनी घटनास्थळी भेट दिली होती. आमदार सामंत यांनी लक्ष घालून ग्रामस्थांचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सोडवला असला तरी दरवर्षी भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे.